Goat Rearing : करडांची मरतूक टाळण्यासाठी काय कराल?
शेळीपालनामध्ये शेळ्यांचे उत्तम आरोग्य, निरोगी करडांची उत्पत्ती व शेळ्यांची विक्री करण्याच्या वयापर्यंतची निगा याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
कमी गुंतवणूकीत जास्त फायदा देणारा व्यवसाय म्हणजे शेळीपालन (Goat Rearing ). त्यामुळे बरेचसे तरुण शेळीपालन व्यवसायाकडे वळत आहेत.
शेळीपालनामध्ये शेळ्यांचे उत्तम आरोग्य, निरोगी करडांची (Goat Kids) उत्पत्ती व शेळ्यांची विक्री करण्याच्या वयापर्यंतची निगा याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
याची सुरवात शेळी ज्या दिवशी गाभण राहते, त्या दिवसापासून सुरू होते. मात्र शेळी विल्यानंतर करडांची जास्त प्रमाणात मरतूक होते.
करडांची व शेळीची मरतूक कमी करण्यासाठी शेळीची गर्भधारणेअगोदर ते करडू जन्मल्यापर्यंत काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळेच सुदृढ आणि निरोगी करडे जन्माला येतील. यासाठी काटेकोर व्यवस्थापनाची गरज आहे.
मथुरा येथील केंद्रीय शेळी संशोधन संस्थेचे (सीआयआरजी) वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एम. के. सिंह यांच्या मतानूसार करडांची मरतूक ही शेळीपालनातील अत्यंत महत्वाची समस्या आहे. करडांची मरतूक झाल्यामुळे शेळीपालकांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागतं.
हे टाळण्यासाठी डॉ. एम. के. सिंह यांनी करडांची मरतूक कमी करण्याचे उपाय सुचवले आहेत. जास्त थंडी किंवा जास्त उष्णता ही करडांसाठी हानीकारक असते.
अति थंडी आणि उष्णतेमुळे करडांची मरतूक होते. उत्तर भारतात अतीथंडीमुळे करडांची मोठ्या प्रमाणात मरतुक होत असल्याचं दिसून आलं आहे.
कारण उत्तर भारतात हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात हवामानात झपाट्याने चढ - उतार होतात. ऑक्टोबर - नोव्हेंबर किंवा फेब्रुवारी - मार्च या महिन्यात हवामान सामान्य असतं. त्यामुळे ऑक्टोबर - नोव्हेंबर मध्ये किंवा फेब्रुवारी - मार्च महिन्यात करडे जन्माला येतील याप्रमाणे शेळ्यांच्या गाभण काळाचं नियोजन करावं.
शेळ्यांमध्ये कृत्रिम रेतन करुन हे साध्य करता येतं. अनुकूल हवामानामुळे ऑक्टोबर - नोव्हेंबर मध्ये किंवा फेब्रुवारी - मार्च या काळातच करडांच वजनही झपाट्यानं वाढत.
करडू जन्माला आल्यानंतर त्याला आर्ध्या तासाच्या आत शेळीचा पहिला चीक पाजावा. करडाच्या दर १ किलो वजनासाठी १०० ते १२५ ग्रॅम चीक याप्रमाणे दिवसातून तीन ते चार वेळा चीक पाजावा. करडू १८ ते २० दिवसाचे झाल्यानंतर कोवळा चारा तसंच भरडलेलं धान्य द्यावं.
करडू तीन महिन्याचे झाल्यानंतर त्याचे वेळापत्रकानूसार लसीकरण करावं. गाभण काळात शेवटच्या तीन महिन्यात शेळ्यांना मुबलक प्रमाणात हिरवा आणि सुका चारा द्यावा याशिवाय खुराक मिश्रणही द्यावं.
त्यामुळे कराडाची चांगली वाढ होते आणि विल्यानंतर शेळ्या चांगल दूधही देतील. अशा उपाययोजनांचा अवलंब केल्यास शेळीपालन व्यवसाय नक्कीच फायदेशीर होण्यास मदत
होईल.

Comments
Post a Comment